शनिवार, २८ जानेवारी, २०१७

कांचनसंध्या

कांचनसंध्या
कवी बा.भ.बोरकर यांची ही एक अतिशय सुंदर कविता.

आयुष्याच्या संध्याकाळी, जेव्हा मुलं-बाळं मार्गी लागलेली असतात, जगाचे भले बुरे अनुभव घेऊन झालेले असतात, त्यावेळी उदासी येण्याऐवजी आयुष्याकडे सकारात्मक कसे बघावे हे ही कविता शिकवून जाते…..

👇

पिलांस फुटुनी पंख तयांची
घरटी झाली कुठे कुठे,

आता आपुली कांचनसंध्या
मेघडंबरी सोनपुटें.

कशास नसत्या चिंता-खंती
वेचू पळती सौम्य उन्हे,

तिमिर दाटता बनुनि चांदणें
तीच उमलतील संथपणे.

सले कालचीं विसरून सगळी
भले जमेचें जिवीं स्मरूं,

शिशुहृदयाने पुन्हा एकदा
या जगतावर प्रेम करूं.

उभ्या जगाचे अश्रु पुसाया
जरी आपुले हात उणे

तरी समुद्रायणी प्रमाणें
पोसूं तटिची म्लान तृणें.

इथेच अपुली तीर्थ-त्रिस्थळी
वाहे अपुल्या मुळी-तळी,

असू तिथे सखि! ओला वट मी आणिक तूं तर देव-तळी.

शिणुनी येती गुरें-पाखरें
तीच लेकरें जाण सखे,

दिवस जरेचे आले जरी
त्या काठ जरीचा लावू सुखें...!

– बा.भ. बोरकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा